शिवथर : परिसरामध्ये सध्या सोयाबीन तसेच इतर खरीप पिके काढण्यास वेग आला असून, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला सोयाबीन उत्पन्नात घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच सोयाबीनचे दर उतरल्यामुळेसुद्धा यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
प्रामुख्याने जूनच्या दुसऱ्या व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या या बहुतांश क्षेत्रावरील पीक आता ९० दिवसांचे झाल्यामुळे काढणीच्या अंतिम टप्प्यावर आले आहे. त्यामुळे शिवथर, वडूथ, आरफळ, मालगाव या परिसरामध्ये सध्या सोयाबीन काढणीची लगबग जोरात सुरू आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे काढलेले पीक बाजारात दाखल होताच दराच्या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.
सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट दर असला तरी गेल्या आठवड्यात असलेला ८२०० दर सध्या ५००० ते ६००० हजारांवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच डिझेल दरवाढीचा परिणाम मळणी मशीनवर झालेला असून, एका पोत्यात सध्या साडेचारशे रुपये एवढा झाला आहे. त्याचबरोबर मजुरीचे दरसुद्धा या वर्षी वाढले आहे. एकरी ४५०० असा काढणीचा दर असल्यामुळे सोयाबीन काढून ते विकेपर्यंत शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नसल्यामुळे याबाबतसुद्धा शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.