सागर गुजर ल्ल साताराकेंद्र व राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपाकडे शहरी मतदारांचा ओढा आहे, हे मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीवरून स्पष्ट झाले होते. हाच धागा पकडून राष्ट्रवादी व काँगे्रसच्या साम्राज्यात घुसण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणांना नगरपंचायतींचा दर्जा देऊन भाजपने नवी रणनीती हाती घेतली आहे. मलकापूर, कोरेगाव व लोणंदनंतर आता सातारा जिल्ह्यातील पाटण, दहिवडी, खंडाळा, मेढा, वडूज या तालुक्यांच्या ठिकाणच्या गावांना नगरपंचायतीचा दर्जा दिला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घोषणा केल्यानंतर ‘लोकमत’ने मार्च महिन्यात हे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. यानंतर नगरपंचायतीच्या निर्मितीला गती मिळाली होती. जिल्ह्यामध्ये सातारा, कऱ्हाड, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, रहिमतपूर या आठ नगपरिषदा आहेत. तर मलकापूर, कोरेगाव, लोणंद, पाटण, दहिवडी, खंडाळा, मेढा, वडूज या आठ नगरपंचायती झाल्या आहेत. नगरपंचायतींना महाराष्ट्र रिजिनल अँड टाऊन प्लानिंग कायदा १९६६ लागू होतो. तसेच नगरपंचायतींच्या गावांचा झपाट्याने विकास होतो. जिल्ह्यातील मलकापूर नगरपंचायतीच्या घोषणेनंतर येथे चौफेर विकास झाला. रस्ते, पाणी योजना, दलित वस्ती विकास या पायाभूत सुविधांसह इतर सुविधा नागरिकांना पुरविणे सोपे जाते. राज्यासह केंद्र शासनाचाही निधी नगरपंचायतीला मिळत असल्याने निधीअभावी रखडलेला विकास होत असतो, हे वास्तव आहे. विकासाच्या बाबतीत विचार केल्यास सत्ताधाऱ्यांचे हे प्रशासकीय धोरण वाखाणण्याजोगे ठरले आहे. मात्र या धोरणामागे त्यांचा राजकीय डाव दडलेला नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राष्ट्रवादीने आपला सातारा बालेकिल्ला शाबूत ठेवला. भाजपला या निवडणुकीत सपशेल अपयश आले. मात्र, शहरी भागातील मतदारांची साथ भाजपला मिळाली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीआधी सरकारने केलेली घोषणा काँगे्रस-राष्ट्रवादीला अस्वस्थ करणारी ठरली असून, या घोषणेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.नगरपंचायतीमुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणांची निवडणुकीपूर्वी मोडतोड करावी लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत याचा परिणाम प्रकर्षाने जाणवणार असून, या परिस्थितीचा भाजप लाभ उठविण्याची शक्यता आहे. शहरी मताधिक्क्यावर कब्जा! साताऱ्याचाच विचार केला तर सातारा-जावळीतील बहुतांश सत्तास्थाने ताब्यात असणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरोधात उभ्या असलेल्या भाजपच्या दीपक पवार यांना विधानसभा निवडणुकीत सातारा शहरातून ३ हजार २०० चे मताधिक्य मिळाले होते. शहरी भागातून भाजपला आपसूक चांगली साथ मिळत असल्याने सातारा जिल्ह्यातील पाच प्रमुख गावांना नगरपंचायतीचा दर्जा देऊन शहरी मताधिक्यावर कब्जा मिळविण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत.
आठ गावचे शहरीकरण भाजपच्या पथ्यावर!--
By admin | Updated: May 31, 2016 00:38 IST