कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील ५६ पैकी ७ ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णत: तर १२ ग्रामपंचायतींची अंशत: निवडणूक बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत तब्बल ३४७ जणांनी माघार घेतली आहे. आता ४९ ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढत होत आहे. ३४४ जागांसाठी ६८७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. नागेवाडी, चिलेवाडी, तडवळे संमत वाघोली, कोलवडी, होलेवाडी, भिवडी व बोधेवाडी (चिमणगाव) या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या ४६८ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल १ हजार १६६ अर्ज आले होते. छाननी प्रक्रियेमध्ये ८ अर्ज अवैद्य ठरविण्यात आल्याने ११५८ अर्ज शिल्लक राहिले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत सोमवारी दुपारी संपली. ३४७ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे ८ ग्रामपंचायतींची पूर्णत: तर १२ ग्रामपंचायतींची अंशत: निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता ४९ ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढत होत आहे. ३४४ जागांसाठी ६८७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
चौकट :
दुरंगी लढत...
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ८ गावांमध्ये निवडणूक बिनविरोध झाल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व नेतेमंडळींनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. १२ ग्रामपंचायतींची अंशत: निवडणूक बिनविरोध झाली तरी त्या-त्या गावांमध्ये उर्वरित जागांसाठी मतदान होणार आहे. एकूणच ३४४ जागांसाठी ६८७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याने थेट दुरंगी लढत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.