महाबळेश्वर : देवळीमुरा येथे गव्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावर २६ नोव्हेंबर रोजी हल्ला करणारे ३० ते ३५ जणांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस त्यांचा शोध घेत असल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना नागपूर यांनी या प्रकरणाचा निषेघ केला असून, शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाने केली आहे.येथून १६ किलोमीटर अंतरावर २०१४ मध्ये देवळी मुरा गावातील काही ग्रामस्थांनी वन विभागात केलेले अतिक्रमण धडक कारवाई करून काढले होते. या कारवाईमुळे गावात वनविभागाबाबत संताप होता. २६ नोव्हेंबर रोजी गव्याच्या हल्ल्यात येथील स्थानिक शेतकरी अख्तर शारवान (वय ४३) हे ठार झाले होते. या हल्ल्याचा पंचनामा करण्यासाठी वनविभागाचे पथक गेले होते. अतिक्रमणाचा राग असलेल्या ग्रामस्थांनी संगनमत करून पंचनामा करण्यासाठी गेलेल्या पथकावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात अशोक मलक, राहुल निकम, रोहित लोहार, विशाल पाटील, महादेव केंद्रे हे वनविभागाचे कर्मचारी जखमी झाले. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या वनक्षेत्रपाल सूर्यकांत कुलकर्णी यांनाही जमावाने बेदम मारहाण केली होती. कुलकर्णी यांच्या वाहनांची मोडतोड करून ते पेटवून देण्याचा प्रयत्नही जमावाने केला होता. कर्मचाऱ्यांच्यावर दबाव आणून त्यांना धमकीही देण्यात आली. या संदर्भात वनक्षेत्रपाल सूर्यकांत कुलकर्णी यंनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, महाबळेश्वर पोलिसांनी अज्ञात ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसली तरी पोलीस आरोपींचा शोध घेत असल्यानेशहरात एकच खळबळ माजली आहे. (प्रतिनिधी)
वनविभागाच्या पथकावर हल्ला करणाऱ्या ३५ जणांवर गुन्हा
By admin | Updated: December 2, 2015 00:41 IST