महाबळेश्वर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ८७ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. उरलेल्या ९ ग्रामपंचायतींसाठी अंशतः तर ५ ग्रामपंचायतींच्या सर्वच्या सर्व सात जागांसाठी अशा चौदा ग्रामपंचायतींच्या निवडणुकासाठी मतदान घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती तहसीलदार सुषमा चाैधरी-पाटील यांनी दिली.
महाबळेश्वर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २९६ जागांसाठी तालुक्यातून ३९३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे बाद ठरली होती. त्यामुळे ३८८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
भिलार येथे ६, सौदरी येथे ५ तर आकल्पे, कोटोशी व आंब्रळ येथे सात जागांसाठी निवडणुका लागल्या आहेत तर कासवंड, गोडवली, कुरोशी, दांडेघर, क्षेत्र महाबळेश्वर, राजपुरी, खिंगर, वाळणे व कुंभरोशी या नऊ ग्रामपंचायतींच्या काही जागांसाठी निवडणुका होणार आहेत, अशी माहिती तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली.