कराड : वीज कनेक्शन जोडलेले नाही,मुळात मोटारच बसवलेली नाही. तरीही शेतकऱ्याच्या हातात तब्बल १९ हजारांचे वीजबिल पडलेले आहे. ते बिल मुदतीत न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येईल असेही त्यात नमूद केले आहे. ही काही काल्पनिक कथा नाही तर आणे ( ता. कराड) येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे. त्यामुळेच वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे .
आणे (ता. कराड) येथील आनंदराव तुकाराम देसाई यांनी गतवर्षी वांग नदीतून शेतीसाठी पाणी उचलण्यासाठी रीतसर परवाना घेतलेला आहे. त्यानंतर त्यांनी वीज कंपनीकडे जोडणीसाठी अर्ज केलेला आहे. जोडणी त्वरित मिळावी म्हणून आजवर अनेक हेलपाटेही त्यांनी कार्यालयात घातले आहेत; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. पण तरीही त्यांच्या हातात वीज बिल मिळाल्याने त्याला धक्काच बसला आहे.
हे बिल हातात पडल्यावर संबंधित शेतकरी अचंबित झाला असून त्याने कोळेवाडी (ता. कराड) येथील कंपनीच्या कार्यालयात सदरचे बिल दाखवले.तेथील कर्मचाऱ्यांना हकीकत सांगितली. त्यावर त्यांनी वीज बिल चुकले आहे. ते बदलून दुरुस्त करून आणा. अशी जुजबी उत्तरे दिली आहेत.पण चूक का व कशामुळे झाली याबाबत शब्द काढलेला नाही. परिणामी वयोवृद्ध असणाऱ्या देसाई यांची चूक नसताना हाल सुरू आहेत.
वास्तविक वीज जोडणी केल्यानंतर मोटार बसवल्यानंतर त्याचा टेस्टिंग रिपोर्ट सादर केला जातो. त्यानंतर वापर सुरू झाल्यावर त्याचे रीडिंग तपासले जाते. त्यानंतर वीज बिल ग्राहकाला दिले जाते. मग आणे येथील संबंधित शेतकऱ्याला वीज जोडणी न देताच त्याचा टेस्टिंग रिपोर्ट कसा केला गेला? वीज वापरच नसताना त्याचे रीडिंग कोणी व कसे घेतले? हा सारा संशोधनाचा भाग आहे.
चौकट
ग्राहकांच्या मनात शंका
वीज कनेक्शन न जोडता वापराचे रीडिंग न घेताच जर वीज वितरण कंपनी ग्राहकाला वीज बिल देत असेल तर ही बाब मोठी गंभीर आहे. शिवाय आपल्या वापरातील वीज मीटरमधील रीडिंग तरी व्यवस्थित घेतली जातात का?त्यात काही झोल आहे का? अशा प्रकारच्या शंका आता ग्राहकांच्या मनात निर्माण होऊ लागल्या आहेत.
(कोट)
मुळातच अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पिकांचे पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई मिळेल का? याची शंका त्यांच्या मनात आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने अशाप्रकारे अनागोंदी कारभार करून वीजजोडणी न करता आज जर वीज बिले द्यायला सुरुवात केली. तर ही बाब गंभीर आहे. आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने त्याचा समाचार घेऊ.
-सचिन नलावडे
रयत क्रांती शेतकरी संघटना