सांगली : जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठीच्या आरक्षणातील बदलामुळे निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील परिपत्रक सोमवारी (दि.२८) प्रसिद्ध करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदांमध्ये गट क संवर्गातील जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. आरोग्य विभागात आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्यपर्यवेक्षक या जागा भरल्या जाणार होत्या. त्यासाठीची जाहिरातही मार्च २०१९ मध्ये प्रसिद्ध केली होती. यादरम्यान एसईबीसी प्रवर्गाचा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी रद्द केला. त्यामुळे त्यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागा निरर्थक ठरल्या आहेत. खुल्या प्रवर्गातील जागांच्या संख्येत बदल झाले आहेत.
अनुकंपा तत्त्वावरील जागांवर नियुक्त्यांचे प्रमाण काही कालावधीसाठी १० टक्क्यांवरून २० टक्के केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदांनी त्या-त्या वेळी भरती केली आहे. त्याचाही परिणाम खुल्या प्रवर्गाची पदसंख्या कमी होण्यावर झाला आहे. भरती प्रक्रियेत दिव्यांगांचाही समावेश करायचा आहे. या बाबी लक्षात घेता आरोग्य विभागाच्या या भरती प्रक्रियेत बदल करून नव्याने प्रक्रिया राबवण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला.