रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथील तरुणांनी नोकरी व शेतीच्या पाठीमागे न लागता आपलं कुटुंब चालविण्यासाठी ट्रक व्यवसाय निवडला आहे. आजमितीला रेठरे धरण येथे सुमारे पावणे दोनशेहून अधिक ट्रक देशातील रस्त्यांवर धावत आहेत.
रेठरे धरण हे वाळवा तालुक्यातील, हद्दीवरील शेवटचे गाव. इथे साधारणपणे सहा हजार एकरवर पूर्व, पश्चिम व दक्षिण बाजूस पूर्ण डोंगराबरोबर शेती आहे. परंतु आजतागायत इथे इरिगेशन योजना नसल्यामुळे इथले तरुण शेती, दुग्धव्यवसाय व सहकारी संस्था, दूध संस्था, सूतगिरणी, साखर कारखाना येथे नोकरी करून उदरनिर्वाह करत होते.
गावात सुमारे १९६० च्या दशकात येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य आर. एस. पाटील व सध्याचे राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांचे वडील पैलवान दत्तू ज्ञानू पाटील यांनी दोन ते तीन ट्रक घेऊन त्या काळात ट्रक व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. श्रीरंग पाटील, राजाबापू पाटील, कृष्णात पाटील, जगन्नाथ घाटके, हिरकन पाटील, पोपटराव पाटील, पांडुरंग पाटील, बबन पाटील यांनी देखील ट्रक खरेदी करून या व्यवसायास सुरुवात केली.
. शिक्षण अपुरे, शेती आहे, पण त्यात फक्त कुसळे उगवत होती. नोकरी मिळण्याची तर शक्यताच नाही. त्यामुळे एकमेकांच्या संगतीने शिक्षित व अशिक्षित तरुणांनी पटापट ट्रक व्यवसायात उड्या घेतल्या. एक नाही, दोन नाही, तर ३० लाख रुपये किमतीच्या आवाक्याबाहेच्या गाड्या राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकेतून व फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन खरेदी केल्या. आपली पत सांभाळत दर महिन्याला ६० हजार ते ८० हजार रुपयांचे हप्ते देखील नियमित भरून बँकांचा विश्वास संपादन केला.
कोट
ट्रक व्यवसायात ट्रकचे दर वाढले, डिझेल दर वाढले, टोल दर वाढले, परंतु त्या प्रमाणात ट्रकभाडे वाढले नसून अत्यंत जिकिरी करून हा व्यवसाय टिकवावा लागत आहे. कोल्हापूर व सांगली शहरातून गूळ व साखर बाहेरील राज्यांत ट्रकमधून नेण्यात येते. यामधून व्यवसायाला हातभार लागतो.
- संताजी मदने, ट्रक व्यावसायिक, रेठरे धरण