जत : जत तालुक्यातील गावकामगार तलाठी व मंडल अधिकारी गावांतील दलालांना हाताशी धरून आणि अज्ञानी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून सातबारा उताऱ्यावर चुकीच्या व बेकायदेशीर नोंदी करत आहेत. यासंदर्भात शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांची भेट घेणार आहे, असे निवेदन शेतकरी संघटनेने प्रसिद्धीस दिले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महसूल कर्मचारी अर्थपूर्ण तडजोड करून संगनमताने बेकायदेशीर नोंदी करत आहेत. कलम ८५ प्रमाणे वाटप पत्र, कलम १५५ नुसार चूक दुरुस्ती आदेश व वारसा नोंद आदी प्रकरणांमध्ये चुकीच्या व बेकादेशीर नोंदी मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. याबाबत जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने देऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. परंतु महसूल प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणावरही कारवाई केेली नाही. त्यामुळे जत तालुक्यात चुकीच्या व बेकायदेशीर नोंदीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे गावात व शेतकऱ्यांत वाद निर्माण होऊन मारामारी, प्राणघातक हल्ले, वेळप्रसंगी निर्घृण खून होत आहेत. महसूल प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे अशा घटना घडत आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुरेश घागरे, जत तालुका अध्यक्ष रमेश माळी, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुका अध्यक्ष दुंडाप्पा बिराजदार यांच्या निवेदनावर सह्या आहेत.