लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शासनाने महिलांसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. अशा योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. त्यासाठी एजंटांकडे जाण्याची गरज नाही, असे मत संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष व राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा उपाध्यक्ष ज्योती अदाटे यांनी व्यक्त केले.
संजय गांधी निराधार योजनेबाबत वंचित लाभार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ या उपक्रमाला गुरुवारी प्रारंभ झाला. यानिमित्ताने महिला मेळावा पार पडला. यावेळी अदाटे म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे शहर जिल्हा सरचिटणीस अर्जुन कांबळे यांनी तसेच विविध भागातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भागातील महिलांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवून दिला आहे. राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे हे कार्य महिलांसाठी दिलासादायक आहे. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. कोणत्याही दलालाकडे प्रस्ताव देऊ नयेत. हा प्रस्ताव करताना शासनाच्या सर्व अटी, नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. या कार्यक्रमाला प्रियांका तुपलोंडे, प्रणोती हिंगलजे, ॲड. विलास बेले आदी उपस्थित होते.