तासगाव : झोपडपट्टी निर्मूलनासाठी तासगाव नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून घरकुलांची उभारणी केली. मात्र या घरकुलांचा दर्जा निकृष्ट आहे. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यांनी चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांचे आदेश सहा महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. त्यामुळे निकृष्ट घरकुलांची चौकशी करुन झोपडपट्टीधारकांना न्याय मिळवून देणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तासगाव शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नगरपालिकेच्यावतीने घरकुल योजना राबविण्यात आली. त्यासाठी केंद्र शासनाकडून साडेचार कोटींचा निधी मिळाला. घरकुल उभारणीचा ठेका देण्यात आला. साडेचार कोटी रुपये खर्ची पडले. ३९७ घरकुले उभारण्यात आली. मात्र या घरकुलांचे काम दर्जाहीन असल्याचे उघडकीस आले. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंंह कुशवाह यांच्याकडे जानेवारी महिन्यात तक्रार करण्यात आली होती. कुशवाह यांनी या तक्रारीची दखल घेत उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. समितीच्या माध्यमातून तासगाव, विटा व इस्लामपूर पालिकांच्या घरकुल योजनेतील कामाचा दर्जा, निधी खर्चाची सखोल चौकशी करण्यात येणार होती. या चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी चौकशीचे आश्वासन देऊनही अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ना चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली, ना नगरपरिषदांना चौकशीसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला. प्रशासकीय पातळीवर चौकशी व कारवाईबाबत टाळाटाळ होत आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांना गळक्या घरातच वास्तव्य करावे लागणार आहे. (वार्ताहर)ठेका एकास, काम दुसऱ्याचे! घरकुल योजनेच्या कामाचा ठेका शिरोळ येथील रोडलॅन्ड कंपनीने घेतला होता. प्रत्यक्षात मात्र हे काम दुसऱ्याच ठेकेदाराने केले असल्याची चर्चा आहे. राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय अनास्था यामुळेच या कामाचा दर्जा निकृष्ट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच कारवाईकडे दुर्लक्ष झाले आहे.
निकृष्ट घरकुलांची चौकशी करणार कोण?
By admin | Updated: June 13, 2015 00:13 IST