सांगलीत नुकत्याच एका राजकीय कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातले कार्यकर्ते आले होते. दहावर काटा आला तरी आभार प्रदर्शनाची चिन्हे दिसेनात. आत भाषणबाजी जोमात होती आणि बाहेर मात्र अस्वस्थता! विषय होता सेलिब्रेशनचा. कार्यक्रमासाठी साहेबांसोबत आलेल्यांना जीवाची सांगली करायची होती, पण कार्यक्रम संपेपर्यंत बार आणि हॉटेल्स बंद होण्याची चिंता. अखेर त्यांनी मध्येच कल्टी मारली. गाडी काढली आणि थेट मधुशाळा गाठली. इकडे साहेबांचा जयजयकार सुरू होता, तर तिकडे कार्यकर्ते हवेत तरंगत होते...
काँग्रेसची दुष्काळी उपाययोजना
आमदार विक्रम सावंत यांच्याकडे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रं सोपविण्याचा कार्यक्रम झाला. जत तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार बोलायला उठले, पण थांबण्याचे नाव घेईनात. बरीच वक्तेमंडळी अद्याप बोलणार असल्यानं संयोजकांनी त्यांना आवरतं घेण्याची सूचना केली. पण बिराजदारांनी ठोक्यात सुनावले, ‘आतापर्यंत सांगलीकरांनी जतवर अन्यायच केलाय, आता थांबवू नका. सूत्रं आमच्याकडे आलीत.’ काँग्रेसनं जतकडे सूत्रं सोपवताना जतकरांचा आत्मविश्वासही वाढवलाय हेच खरं!