अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोना रुग्णांत वाढ झाल्याने जिल्ह्यात आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. परंतु इस्लामपुरात सकाळी, संध्याकाळी भरणारी भाजी मंडईमधील गर्दी बघितली, तर आठवडा बाजार बरा, अशी परिस्थिती आहे. यावर आरोग्य खाते, नगरपालिका आणि पोलिसांचे नियंत्रणच नाही.
सध्या वाळवा तालुक्यात रुग्ण वाढत आहेत. नगरपालिका प्रशासन फक्त ध्वनिक्षेपकावरून आवाहन करण्यापलीकडे कोणतीच कारवाई करत नाही. इस्लामपुरात रविवार, गुरुवार दोन आठवडी बाजार भरतात. शासनाने आठवडी बाजार बंद केले आहेत. परंतु सकाळी गणेश मंडई, सायंकाळी मुख्य बाजारपेठेत भाजी बाजार भरतो. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. मुख्य बाजाराएवढी गर्दी असते. यल्लमा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत भाजीपाला, फळ विक्रेते आणि ग्राहक, दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ, रस्त्यांवर हिंडणारे कोरोनाबाधित यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.
ग्रामीण भागातून रोज एसटी बसमधून हजारो विद्यार्थी इस्लामपुरात येतात. यामध्ये ९० टक्के विद्यार्थी विनामास्क असतात. ते बसस्थानक, शहरातील बहे नाका, ताकारी नाका, बस थांब्यावर टोळकी करून उभी असतात. तेथे कोणतीच बंधने पाळली जात नाहीत, तर मुख्य बाजारपेठ नेहमीच गजबजलेली दिसते.
कोट
गेल्या मार्चमध्ये शहरातील भाजीपाला विक्रीचे योग्य नियोजन करण्यात आले होते. सध्याही प्रादुर्भाव वाढत आहे. भाजी मंडईतील गर्दी कमी करण्यासाठी विक्रेत्यांचे नियोजन करण्याची खबरदारी घेण्यात येईल.
- अरविंद माळी, मुख्याधिकारी, इस्लामपूर नगरपरिषद