शिराळा : शिराळा पाटबंधारे विभागांतर्गत असणाऱ्या मोरणा मध्यम प्रकल्पामध्ये फक्त ९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने उद्या दि. ३० एप्रिल रोजी वाकुर्डे बुद्रूक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात येणार आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे शेतकरी, नागरिकांनी मागणी केली होती. त्यानुसार हे पाणी मोरणा मध्यम प्रकल्पात सोडण्यात येणार आहे.
शिराळा शहरासह आसपासच्या सहा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोरणा मध्यम प्रकल्पामध्ये ९ टक्के, करमजाई तलाव ९३ टक्के, अंत्री बुद्रूक तलाव २३ टक्के, शिवणी तलाव १० टक्के, टाकवे तलाव १९ टक्के, रेठरे धरण तलाव १ टक्के, कार्वे तलाव १८ टक्के याप्रमाणे पाणीसाठा शिल्लक आहे. रेठरे धरण तलावातून शेतीसाठी पाणी बंद केले आहे. फक्त पिण्यासाठी पाणी वापरले जात आहे.
आ. नाईक यांनी सूचना केल्याप्रमाणे कार्यकारी अभियंता वारणा कालवे विभाग इस्लामपूर डी. डी. शिंदे, सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे, शाखा अधिकारी सी. बी. यादव, शाखा अभियंता एस. डी. देसाई, एस. के. पाटील यांनी नियोजन करून सुरुवातीला अंत्री तलावात पाणी सोडले होते. आता मोरणा प्रकल्पात शुक्रवारी पाणी सोडण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्याने वाकुर्डे योजनेचे पंप बंद होत आहेत. पाणी सोडण्यास विलंब होत आहे.
चौकट
पाण्याचा काटकसरीने वापर करा : देसाई
जर शेतकऱ्यांनी पाणी वापर आणि उपसाबंदीचे काटेकोरपणे पालन केले तर उद्या संध्याकाळपर्यंत पाणी मोरणा प्रकल्पात पोहोचेल. एप्रिल महिन्यातच पाण्याची बिकट परिस्थिती आहे. दि. १ मार्चपासून रेठरे धरण तलावातील पाणी शेती वापरासाठी बंद केले आहे. याचबरोबर अंत्री तलावातील पाणी वापरही काटकसरीने करावा, असे आवाहन मोरणा प्रकल्पाचे शाखा अभियंता एस.डी. देसाई यांनी केले आहे.