वाळवा : हुतात्मा साखर कारखान्याने २०२०/२१ या गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाचा दुसरा हप्ता अद्याप दिलेली नाही. ती २८ जूनपूर्वी आदा करावी; अन्यथा क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या स्मारकस्थळी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबत कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शुगर कंट्रोल ॲक्ट १९६६ प्रमाणे कारखान्याकडे गाळपास घातलेल्या शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट १४ दिवसांच्या आत आदा करायचे आहे. परंतु, कारखान्याने ते अंशतः म्हणजे २५०० रुपये प्रतिटन अदा केले आहे. अद्याप ५९४ रुपये प्रतिटन अदा करायचे आहेत. ही थकीत बिले २८ जूनपूर्वी शेतकऱ्यांना अदा न केल्यास क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या स्मारकस्थळी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.