जत : म्हैशाळ टप्पा क्रमांक ६ मुख्य कालव्यासाठी जत तालुक्यातील घोलेश्वर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी मुख्य कालव्यामध्ये २००९ पासून अधिग्रहण केल्या आहेत, पण आजअखेर जमिनीचा मोबदला मिळाला नाही. आता शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यास १२ जुलै रोजी जत येथील बाजार समितीच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू करणार, असा इशारा महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक कल्याण समितीचे जिल्हा सदस्य सलिम गरवंडी यांनी दिला आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित अधिकारी हे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करत असून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून जमिनीचा मोबदला घेण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. या कालव्यामधून गावतळे भरण्यासाठी जे पाणी सोडण्यात आले, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून जात आहे. हे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. जर एक महिन्याच्या आत जमिनीचा लाभ मिळाला नाही तर जत तालुक्यात एकही मंत्री व खासदारांना फिरू न देण्याचा इशारा सलिम गवंडी यांनी दिला आहे.