सिंधुदुर्गनगरी, मालवण : मालवण तालुक्याला काल, शुक्रवार सायंकाळपासून शनिवारी पहाटेपर्यंत दमदार पावसाने झोडपून काढले आहे. यात देवबाग केळुसकरवाडी येथील जुजे गिरगोल फर्नांडिस यांच्या घरावर संरक्षक भिंत कोसळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले, तर अन्य ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मालवण येथील सोमवार पेठेत समुद्राचे पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस पावसाचा जोर वाढला असून, गेल्या चोवीस तासांत सरासरी ८४.८३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे, तर येत्या २४ तासांत कोकण व गोवा समुद्रकिनारपट्टी भागात ताशी ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तरी मच्छिमारांनी तसेच संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच पावसाने जोर धरल्याने या उत्सवाच्या आनंदावर काही प्रमाणात विरजण पडले. आज, शनिवारी पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. गेल्या चार दिवसांत जिल्हावासीयांना आज सूर्यदर्शन घडले. त्यामुळे पुन्हा एकदा गणेशोत्सवात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पडलेल्या पावसामुळे मालवण तालुक्यात घरांचे, मांगराचे काही प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशाराकोकण, गोवा सागरी किनारपट्टी भागात येत्या २४ तासांत ताशी ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने मच्छिमार व किनारपट्टी भागातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच संबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
घरावर कोसळली संरक्षक भिंत
By admin | Updated: August 31, 2014 00:20 IST