जत : जत तालुक्यात निवडणुका होत असलेल्या तीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण १५ जानेवारीनंतर काढण्यात येणार आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आरक्षण सोडतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जनतेतून थेट सरपंच निवड रद्द केल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांमधून आता सरपंच निवड करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे, त्या प्रवर्गातील उमेदवाराच्या प्रचारावर भर देऊन सरपंचपद मिळविण्यासाठी पॅनलप्रमुख कसोशीने प्रयत्न करतात. परंतु सरपंच पदाचे आरक्षण झाले नसल्यामुळे ते आता निवडणूक निकालानंतर होणार आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या व पॅनलप्रमुखाच्या मनामध्ये संदिग्ध अवस्था निर्माण झाली आहे. निवडणूक निकालानंतर सरपंच पदासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवर्गातील उमेदवार पॅनलप्रमुख यांच्याकडे नसेल, तर त्या पॅनलची व पॅनल प्रमुखाची आरक्षणानंतर पंचाईत होणार आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. अगोदर आरक्षण, त्यानंतर निवडणुका असे चित्र आजपर्यंत होते. परंतु आता अगोदर निवडणुका, त्यानंतर आरक्षण असा उलटा प्रवास होणार आहे का? असा प्रश्न सरपंच पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार उपस्थित करू लागले आहेत.