फोटो ओळी : दुधेभावी (ता. कवठेमहंकाळ) येथील तलावातील उपलब्ध पाणीसाठा.
जालिंदर शिंदे
घाटनांद्रे : पावसाळा संपायाला काही दिवसच बाकी राहिले असतानाही कवठेमहंकाळ तालुक्यातील बऱ्याच भागात ओढे, नाले, बंधारे अद्यापही कोरडे ठणठणीत आहेत. तालुक्यातील एकूण अकरा तलावांपैकी नृसिंहगाव (लांडगेवाडी) तलावात कमी पाणीसाठा असल्याने सील करण्यात आला आहे. तर कुची, बंडगरवाडी तलावात जेमतेम पाणीसाठा आहे. दुधेभावी व लंगरपेठ तलावात टेंभू सिंचन योजनेचे पाणी सोडल्याने त्याला चांगलाच आधार मिळाला आहे. उर्वरित तलावही सिंचन योजनेतून भरण्याची गरज निर्माण झाली आहे.
शासकीय आकडेवारीनुसार तालुक्यातील अकरा तलावांपैकी रायवाडी व दुधेभावी तलावात समाधानकारक पाणीसाठा आहे. लंगरपेठ तलावात टेंभूचे पाणी सोडल्याने बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. उर्वरित तलावातील पाणीसाठा चिंताजनक आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. गतवर्षी अवकाळीसह मोसमी पाऊस झाल्याने कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यासह नागज, ढालगाव या कायमस्वरुपी टंचाईग्रस्त असणाऱ्या गावात यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. तसेच तलावातील पाणीसाठाही बऱ्यापैकी होता.
सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे उगवण झालेल्या या खरीप हंगामातील पिकांची वाढ होत असली, तरी जमिनीबरोबर तलावातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.
सध्या म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी कवठेमहांकाळ व जत तालुक्यासाठी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा वापर करून लांडगेवाडी, बंडगरवाडी, बोरगाव, नांगोळे, हरोली व बसप्पावाडी हे तलाव भरून घेणे शक्य आहे.