अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरात भूखंड माफियांनी दहशतीबरोबर राजकारणातही ताकद वाढविण्याचा कार्यक्रम आखला आहे. त्यांच्यावर राजकारण्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे शहरातील विकासाला खीळ बसली आहे. पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात विकासाचे तीन-तेरा वाजले आहेत.
मागील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या कारकीर्दीत शहरातील विकास कामांना गती मिळाली, परंतु त्यांचा निकृष्ट दर्जा वेळोवेळी स्पष्ट झाला आहे. विकास आराखड्याचे घोंगडे भिजत पडले होते. याचा फायदा भूखंड माफियांनी उठवला आहे. काहींनी मोकळ्या जागांवर बेकायदेशीर कब्जा करून त्या हडप केल्या आहेत. त्यांची पाठराखण काही राजकीय नेते करताना दिसतात. गुंठेवारीचे नियम धाब्यावर बसवून शहरात बेसुमार बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत. आणेवारीतील जागाही भूखंड माफियांनी सोडलेल्या नाहीत.
नगरपालिका निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. भुयारी गटारी योजनेचे काम पुन्हा सुरू करण्याची घोषणा झाली आहे. परंतु मल:निस्सारण प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे रस्त्यांची कामेही अडकून पडली आहेत. आरोग्य सुविधेकडे दुर्लक्ष झाल्याने रोगराईचा संसर्ग वाढत आहे. शहरालगतच्या जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. विकासापेक्षा जमिनींच्या व्यवहारात बहुतांशी राजकीय नेते गुुंतले आहेत. सामान्य नागरिक आयुष्यभर मिळविलेली रक्कम घेऊन घर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अडचणी येत आहेत.
कोट
भुयारी गटारीचे काम जलद गतीने व्हायला हवे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी पालिकेसाठी साडेतेरा कोटीचा निधी आणला आहे. रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे. त्याचे खापर कर्मचाऱ्यांवर फोडले जात आहे.
- शहाजी पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी, इस्लामपूर.