संख : तुरळक पाऊस, ढगाळ वातावरण, वाढती थंडी यामुळे जत पूर्व भागातील द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले आहेत. पावसामुळे परिपक्व बागेतील द्राक्ष मण्याची गळती होऊ लागली आहे. मणी तडकणार आहेत. रॅकवर टाकलेला बेदाणा काळा पडणार आहे.
तालुक्यात ११ हजार एकर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. पूर्व भागात दर्जेदार बेदाणा उत्पादकांची संख्या अधिक आहे. ऑक्टोबर छाटणी घेऊन नैसर्गिकरीत्या द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते.
हंगामाच्या सुरुवातीस जोरदार पाऊस, प्रतिकूल हवामानामुळे दावण्या रोगाने बागा वाया गेल्या आहेत. घड जिरणे समस्यांनी नुकसान झाले आहे. परतीच्या मुसळधार पावसाने बागेत जास्त काळ पाणी साचून घड कमी सुटले आहेत. अवेळी आलेल्या पावसाची जबर किंमत उत्पादकांना मोजावी लागली आहे. पहिल्या पावसातही घड कूज झाली आहे. घडाची वाढ खुंटली आहे. या संकटावर मात करीत द्राक्षे बागायतदारांनी बागा आणल्या आहेत.
मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणाचे संकट आहे. याचा फटका बागांना बसणार आहे. घडात पाणी साचून द्राक्ष मण्याची गळती व मणी तडकणार आहेत.