आटपाडी : रविवार हा आटपाडी तालुक्यासाठी घातवार ठरला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुचाकीच्या अपघातात दोन दुचाकीस्वारचा मृत्यू झाला; तर पाच जण जखमी झाले. या घटनांची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.
पहिला अपघात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आटपाडी-निबवडे मार्गावर खंडोबा टेक येथे दोन दुचाकी समोरासमोर धडकून झाला. यात दिनकर राजाराम गोडसे (रा. सोमेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांचा मृत्यू झाला. याबाबत आटपाडी पोलिसांत मयत दिनकर यांचा मुलगा दादासाहेब गोडसे याने फिर्याद दिली आहे.
रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आटपाडी-निंबवडे मार्गावर खंडोबा टेक येथून जाताना दिनकर गोडसे यांच्या दुचाकीची (एम. एच. १३ ए. क्यू. १६८८) व अप्पासाहेब जालिंधर ऐवळे (रा. आटपाडी) यांच्या दुचाकीची (एम. एच. १० ए. सी. ७०३८) समोरासमोर धडक झाली. यात गोडसे गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर गोडसे यांच्या गाडीवरील पाठीमागे बसणारे सोपान रामू गळवे व धडक दिलेले अप्पासो जालिंधर ऐवळे हे गंभीररीत्या जखमी झाले.
दुसरा अपघात आटपाडी पोलीस ठाण्यानजीक दिघंची रस्त्यावर रविवारी रात्रीच दहा वाजण्याच्या सुमारास झाला. यात दोन दुचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार झाला. अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. मनीष चंद्रकांत लांडगे (रा. साठेनगर आटपाडी) असे मृताचे नाव आहे.
रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आटपाडी पोलीस ठाण्यानजीक साठेनगर चौकात आटपाडी-दिघंची मार्गावर भरधार जाणाऱ्या दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात मनीष लांडगे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या पाठीमागे बसलेला मल्हारी विश्वनाथ लांडगे हा जखमी झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत. त्यांची माहिती समजू शकली नाही. याबाबत मयत मनीषचे चुलते विजय लांडगे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.