लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथे दोन कुटुंबात किरकोळ कारणातून कुऱ्हाड आणि काठीने झालेल्या मारामारीत दोघे जखमी झाले. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी झाला. याबाबत पोलिसांत दोन्ही बाजूकडून परस्परविरोधी फिर्याद देण्यात आल्या आहेत.
संदीप बबन माळी (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीत संतोष तानाजी बनसोडे आणि भूपाल चंदु बनसोडे या दोघांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. माळी यांनी दोन वर्षांपूर्वी बनसोडे यांना पाण्याची टाकी वापरण्यास दिली होती. ती परत मागण्यासाठी गेल्यावर संतोष बनसोडे याने कुठली टाकी, मी तुझी टाकी देत नाही, तुला काय करायचे ते कर, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर वरील दोघांनी कुऱ्हाड आणि काठीने संदीप माळी यांना मारहाण करत गंभीर जखमी केले. माळी यांच्या हाताच्या मनगटावर वार बसला आहे. हल्लेखोरांनी त्यांना जिवे मारण्याचीही धमकी दिली.
संतोष तानाजी बनसोडे याने संदीप माळी याच्याविरुद्ध काठीने मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. संतोष कामावरून घरी जात असताना माळी याने त्याला दारूच्या नशेत शिवीगाळ केली. संतोष समजून सांगत असताना संदीप याने संतोषच्या आई आणि पत्नीला थोबाडीत मारल्या. त्यानंतर संतोषच्या गुडघ्यावर, पाठीत आणि हातावर मारहाण केली. या दोन्ही गुन्ह्याचा तपास हवालदार सोमनाथ पाटील करत आहेत.