दोन दिवसाच्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सांगलीत शुक्रवारी भाजी मंडईत गर्दी झाली होती.
फोटो : ०९०४२०२१एसएएन०२ :
‘वीकेंड लॉकडाऊन’ला सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी रात्री सांगलीत पोलिसांकडून रस्त्यावरील वाहनचालकांना हटकले जात होते.
फोटो : ०९०४२०२१एसएएन०३ :
‘वीकेंड लॉकडाऊन’ला सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी रात्री सांगलीतील विश्रामबाग उड्डाण पुलावर शुकशुकाट होता.
(सर्व छायाचित्रे : सुरेंद्र दुपटे)
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. शुक्रवारी रात्री आठनंतर सुरू झालेले लॉकडाऊन सोमवारी सकाळी सातपर्यंत असेल. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असतीलच, शिवाय नागरिकांना विनाकारण फिरण्यासही बंदी आहे. दरम्यान, शुक्रवारी खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. भाजीपाल्यासह किराणा खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र होते.
राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ नियमावलीनुसार वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यात शुक्रवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी सातपर्यंत पूर्ण संचारबंदी लागू असणार आहे. शनिवार व रविवार हे दोन्ही दिवस पूर्ण लॉकडाऊन असणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. गेल्या पाच दिवसात यास संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकही दिवसभर बाहेर फिरताना दिसून येत आहेत. आता शनिवार आणि रविवार या दोन दिवशी मात्र पूर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. वैद्यकीयसह इतर कारणांसाठी बाहेर पडणाऱ्यांकडे त्याबाबतचे सबळ कारण आवश्यक आहे. अत्यावश्यक सोडून इतर सेवा बंद राहणार असल्याने विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री आठपासूनच प्रमुख रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चौकट
लॉकडाऊन आणि पुन्हा गर्दी
शनिवारी, रविवारी कडक लॉकडाऊन असल्यामुळे शुक्रवारी सर्व बाजारपेठेत मोठी गर्दी होती. भाजीपाल्यासाठी तसे किराणा दुकानात रांगा लागल्या होत्या. इतर व्यावसायिकांनीही दुकानांची शटर उघडली होती. शहरातील मारुती रोड, हरभट रोड, कापड पेठ, शिवाजी मंडई परिसरात उभे राहायलाही जागा नव्हती. गर्दीमुळे कोरोनाविषयक उपाययोजनांचा मात्र फज्जा उडाल्याचे दिसून आले.
चौकट
या सेवा राहणार सुरू...
रुग्णालये, औषध दुकाने, बेकऱ्या, खाद्यपदार्थांची दुकाने, भाजीपाला विक्री केंद्रे उघडी राहणार आहेत. हॉटेल्समधून केवळ होम डिलिव्हरी सेवा सुरू राहील. अत्यावश्यक कारणासाठी प्रवासी सेवा, मालवाहतूक सेवा, शेतीविषयक कामे, त्यासाठी लागणाऱ्या साधनांची वाहतूक, दूध वाहतुकीसह इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. प्रवासासाठी योग्य सबळ कारण असेल, तरच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.