लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत तालुक्यात तुकारामबाबा महाराज यांनी श्रीसंत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून सलग दुसऱ्या वर्षी भाजीपाला वाटप केले. नऊ दिवसांत तालुक्यातील ५४ गावांमधील १८ हजार कुटुंबांना त्यांनी ७२ टन भाजीपाला घरोघरी जाऊन पोहोच केला.
लॉकडाऊनमुळे एका बाजूला भाजीपाला बांधावर पडून खराब होऊ लागला तर दुसरीकडे भाजीपाला मिळत नसल्याने सर्वसामान्यांचे हाल सुरु होते. त्यामुळे तुकाराम बाबांनी सलग दुसऱ्या वर्षी भाजीपाला वाटपाचा निर्णय घेतला.
त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला विकत घेतला. स्वच्छ करुन तो गाडीने प्रत्येक गावात पोहोच केला. तो त्या-त्या गावातील मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून घरोघरी पोहोच करण्यात आला. नऊ दिवसांत ५४ गावांमधील १८ हजार कुटुंबांना प्रत्येकी किमान चार किलो भाजीपाला असे एकूण ७२ टन भाजीपाला वाटपाचे नियोजन केले.
येळवी येथे या उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी उपसरपंच सुनील अंकलगी, दीपक अंकलगी, अविनाश पोरे, भारत क्षीरसागर, संतोष पाटील, नंदकुमार खंडागळे, तुकाराम सुतार, विक्रांत रुपनूर, सुधीर रुपनूर, आदी उपस्थित होते.
कोट
गेल्यावर्षी साडेसात हजार मास्क, पाच हजारांहून अधिक जणांना जीवनावश्यक किट, पंधरा हजार कुटुंबांना भाजीपाला वाटप केले होते. यावर्षीही मदत सुरू ठेवली आहे.
- तुकारामबाबा महाराज,
मठाधिपती, चिकलगी भुयार मठ.