सांगलीत नागरिक बिनधास्त
सांगली : शहराच्या विविध भागांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. कोरोनाबाधितांची संख्या हजारामध्ये आहे. या युद्धात मनुष्यबळाची कमतरता जाणवत असताना, त्यांना नागरिकांनी घरात बसून सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र सांगलीकर सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करत आहेत. अनेकजण मास्कचाही वापर करत नाहीत. त्यामुळे अशा लोकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
भाजीमंडई रस्त्यावर
सांगली : सांगलीतील शिवाजी मंडईची भाजीमंडई रस्त्यावरच भरत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर तेथे मोठी गर्दी वाढली आहे. त्यातच या परिसरात भाजी, फळविक्रेते रस्त्याकडेला बसलेले असतात. या विक्रेत्यांना काहीवेळा पोलीस हुसकावून लावतात; पण पोलीस गेल्यानंतर ते पुन्हा येतात.
प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर
सांगली : महापालिका प्लास्टिकविरोधात चांगली मोहीम राबविली होती. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर वारंवार कारवाईही करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांवर वचक बसला होता. मात्र कोरोनाची साथ आलेली असल्याने प्रशासन या कामात व्यस्त आहेत. याचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. ग्राहकांनी मागणी नाही केली, तरी फळविक्रेते प्लास्टिक पिशव्या देत आहेत. त्यामुळे सरसकट कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
स्मशानभूमीत भौतिक सुविधांचा अभाव
सांगली : ग्रामीण भागात असलेल्या काही स्मशानभूमीत नागरिकांना सावली, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाहीत. त्यामुळे नागरिकांना अंत्यविधीचे कार्यक्रम उन्हातच आटपावे लागतात. त्यामुळे तेथे भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
रस्त्याचे काम अर्धवट
खानापूर : करंजे ते भिवघाट रस्त्याचे डांबरीकरणाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. साइडपट्ट्याही भरण्यात आल्या नाही. रस्त्याच्या खाली उतरलेली वाहने स्लिप होत आहेत. यामुळे नागरिकांमधून ठेकेदाराविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. मुरुम टाकून रस्ता वाहतुकीयोग्य करण्याची मागणी आहे.
नांगरणीचे दर वाढले
पलूस : डिझेलच्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ट्रॅक्टरने मशागतीचा खर्च यामुळे वाढला आहे. नागरणीच्या दरात ३० ते ३५ टक्के वाढ झाल्याचे चित्र आहे. फळबाग आणि भाजीपाला ओलितासाठी डिझेलची आवश्यकता आहे. यासाठीचाही खर्च वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत
सांगली : शहरातील घनश्यामनगर, विकासनगर भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, तो तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेले अनेक महिने येथे नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही. कमी दाबाने पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिक संतप्त आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.