लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृष्णाकाठावर गेल्या काही वर्षांत मगर व माणसांचा संघर्ष तीव्र झाला आहे. या दोहोंकडून परस्परांचे प्राण घेण्यापर्यंत घडामोडी घडल्या आहेत. पण अनेकदा मगरींना जीवदान देण्याची भूतदयादेखील नागरिकांनी दाखविली आहे. कारंदवाडीमध्ये (ता. वाळवा) शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. ११) एका मगरीची जाळीतून सुटका करत जीवदान दिले.
हाळभागात शेतकरी प्रभाकर पाटील नदीत मोटारीच्या कामासाठी गेले असता, पाण्यात तडफडणारी मगर दिसली. मच्छिमारांनी मासे पकडण्यासाठी पूर्ण पात्रात आडवी जाळी लावली होती. प्रवाहासोबत पोहणारी मगर जाळीत सापडली. सुटण्यासाठी धडपड करताना आणखी फसत गेली.
प्रभाकर पाटील व अभिजित पाटील यांनी मगरीच्या सुटकेसाठी प्रयत्न केला. काहिलीतून पलीकडील तिरावर गेले. तेथून जाळे कापले. जाळ्यासह मगरीला ओढत पात्राबाहेर जमिनीवर आणले. माणसांची चाहूल लागताच मगर हिंस्त्र बनू लागली, त्यामुळे तिला सोडविणे पाटील यांना शक्य झाले नाही. त्यांनी सांगतील ॲनिमल राहत संस्थेला कळविले. तेथून कार्यकर्ते येईपर्यंत मगरीच्या चेहऱ्यावर टॉवेल टाकून शांत करण्याचा प्रयत्न केला.
राहतच्या कौस्तुभ पोळ, योगेश इनामदार, प्रसाद सूर्यवंशी यांनी मगरीवर नियंत्रण मिळवित जाळी कात्रीने कापली. शेपटीपासून कापत तिला पूर्णपणे मोकळे केले. तिच्या तोंडाजवळची जाळी कापणे जोखमीचे होते. पण प्राणीप्रेमींनी धाडस दाखवित सुमारे पाच फूट लांबीच्या मगरीची अर्ध्या-पाऊण तासात सुटका केली. जाळी पूर्ण निघाल्याची खात्री झाल्यानंतर टॉवेल काढण्यात आला. त्याचक्षणी मगरीने नदीपात्रात धाव घेतली.
चौकट
मच्छिमारांचा उत्साह मगरींच्या जिवावर
कृष्णा नदीपात्रात सध्या मुबलक पाणी असल्याने मासेमारीला उधाण आले आहे. अशास्त्रीय पद्धतीच्या मासेमारीमुळे मगरींचे प्राण धोक्यात येताहेत. दोन दिवसांपूर्वी अंकलखोपमध्येही कृष्णेत एका जाळ्यात अडकलेली मोठी मगर दिसून आली, तिची सुटका अजूनही झालेली नाही. जाळ्यात अडकलेल्या स्थितीतच ती नदीपात्रत वावरत आहे.
---------