इस्लामपूर : विठ्ठलवाडी (ता. वाळवा) येथील एका हॉटेलवर जेवण दिले नाही, या कारणावरून हॉटेल मालक पती-पत्नी आणि ग्राहकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेनऊच्यासुमारास घडला. यामध्ये तिघे जखमी झाले. पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत कुबेर नामदेव जाधव (३८, रा. जशाव मळा, विठ्ठलवाडी) व अन्य आठ अनोळखी, सादिका किस्मत नदाफ आणि किस्मत नदाफ (दोघे रा. हनुमाननगर, इस्लामपूर) यांच्याविरुद्ध मारामारीचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुबेर जाधव हा नदाफ यांच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. त्यावेळी नदाफ यांनी त्याला, तू व्यवस्थित पैसे देत नाहीस, तुला जेवण देणार नाही, असे म्हणत ढकलून बाहेर काढले. तसेच लोखंडी रॉडने जाधव याला मारहाण करत जखमी केले. या घटनेचा राग आल्याने कुबेर जाधव याने आपल्या भावकीतील ७ ते ८ जणांना बोलावून घेत नदाफ पती-पत्नीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. तसेच हॉटेल जाळून टाकण्याची धमकी दिली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस करत आहेत.