सांगली : जिल्हा परिषदेच्या ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ उपक्रमासाठी ग्रामस्थांनीही पाठबळ दिले आहे. भडकंबे (ता. खानापूर) येथील ग्रामस्थांनी चार गुंठे जागा शाळेसाठी दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे बक्षीसपत्र केले. तात्यासाहेब जाधव, विलास जाधव, संतोष बागणे, मच्छिंद्र जाधव, लक्ष्मण जाधव, पांडुरंग जाधव, राजाक्का कदम या दानशुरांचे अभिनंदन जिल्हा परिषदेने केले.
कल्याळ- तेलीवस्ती, बोर्गी (ता. जत ) येथे रुद्रगौंडा बिराजदार यांनी सहा गुंठे जागा कन्नड शाळेसाठी जिल्हा परिषदेच्या नावे केली. देशिंग येथील जॉलीबोर्ड कंपनीने कवठेमहांकाळ तालुक्यातील दीड हजार वर्गांसाठी नोटीस बोर्ड व पीन बोर्ड दिले. जत तालुक्यातील शाळांनाही ४३६ नोटीस बोर्ड व २१३६ पीन बोर्ड दिले. खेराडेवांगी येथील शाळेच्या सुशोभिकरणासाठी ग्रामस्थांनी तीन लाखांचा निधी उभारला आहे. या सर्व दानशुरांचे अभिनंदन शिक्षण समितीच्या सभेत करण्यात आले. शिक्षकांनी ऑनलाईन व ऑफलाईन वर्गांद्वारे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे आवाहन समितीने केले.