लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत येडेमच्छिंद्र-वांगी गटात सर्वसाधारण पुरुषाच्या दोन जागा आहेत. त्यामुळे या गटात उमेदवारी मिळविण्यासाठी मोठी चुरस होती. सहकार पॅनलने उमेदवारी निश्चित करून प्रचारात बाजी मारली आहे, तर संस्थापकने सर्व इच्छुक उमेदवारांसहित प्रचाराचा प्रारंभ केला आहे. यावेळी तिन्ही गटाकंडून येडेमच्छिंद्र व देवराष्ट्रे गावांना संधी मिळेल, अशी सभासदांतून चर्चा आहे.
येडेमच्छिंद्र-वांगी गटात वाळवा तालुक्यातील ६ व कडेगाव तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे. क्रांतिसिंहांची जन्मभूमी असलेल्या येडेमच्छिंद्र येथे सुरुवातीला सहकार पॅनलकडून २१ उमेदवार इच्छुक होते. कृष्णाच्या कार्यक्षेत्रात येडेमच्छिंद्रच्या इच्छुक उमेदवारांची मोठी चर्चा होती. अखेर कासेगाव शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव बाबूराव पाटील यांनी उमेदवारीवरती आपली मोहोर उमटवीत क्रांतिसिंहांच्या साक्षीने प्रचारास सुरुवातही केली आहे.
मनोमिलन होवो अगर न होवो, सुरुवातीपासूनच रयत पॅनलकडे इच्छुक असलेल्या संजय जगन्नाथ पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित धरूनच प्रचारास सुरुवात केली आहे. संस्थापक पॅनलकडून कृष्णाचे माजी उपाध्यक्ष सुरेश गणपती पाटील व बाबासाहेब वसंतराव पाटील या दोघांनीही उमेदवारीवरती दावा करून प्रचारास सुरुवात केली आहे. दोघांचेही कार्यकर्ते उमेदवारी आपणालाच मिळणार यावरती ठाम आहेत.
सहकार पॅनलकडून अशोक मारुती देशमुख मोहित्यांचे वडगाव व देवराष्ट्रे येथील बाबासाहेब खाशाबा शिंदे यापैकी बाबासाहेब शिंदे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात आहे. रयतकडून देवराष्ट्रेचे राजाराम रामचंद्र महिंद व बापुसाहेब गणपतराव मोरे यापैकी एकाची, तर संस्थापककडून देवराष्ट्रेचेच माणिकराव आनंदराव मोरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. संस्थापकचे मोहित्यांचे वडगाव येथील माजी संचालक पांडुरंग मोहिते यांनीही उमेदवारीवरती प्रबळ दावा केला आहे.
चौकट
घाटमाथ्यावरील १५ गावांतून राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे चुलचे रघुनाथ कदम यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने रयतकडून कोणाला संधी मिळते, याची प्रतीक्षा आहे. मंत्री विश्वजित कदम व युवानेते जितेश कदम हेच रयतचे घाटमाथ्यावरील सारथी असणार हे निश्चितच आहे.
चौकट
मनोमिलनाचा बार फुसका ठरल्यास तिन्ही गटांकडून घाटाखाली क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी असलेल्या येडेमच्छिंद्रला प्राधान्य मिळेल, तर घाटमाथ्यावरती महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेल्या देवराष्ट्रे गावातूनच तिन्ही उमेदवार येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.