आटपाडी
: सरकारी काम आणि सहा महिने थांब...! अशी एक आपल्याकडे म्हण प्रचलित आहे. या म्हणीचा अनुभव सध्या आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे. अवकाळी पाऊस आणि पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत देणार, अशी घोषणा करणाऱ्या सरकारची मदत आता शिमगा जवळ आला तरीही देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीची अजून किती दिवस वाट पाहायची, असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे.
गेल्या जूनपासूनच आटपाडी तालुक्यात विक्रमी पर्जन्यवृष्टी झाली. ऑक्टोबर महिन्यापर्यंत विक्रमी पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे आणि विशेषतः डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे डाळिंबावर केलेला कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेला. यावेळी शासनाकडून मदत मिळेल, ही आशा मात्र फोल ठरली.
पंचनामे होऊन सहा महिने होऊन गेले; परंतु आटपाडी तालुक्यातील अद्याप दहा गावांतील शेतकऱ्यांना एका रुपयाची शासनाने मदत केलेली नाही.
तालुक्यातील शेटफळे, तळेवाडी, तडवळे, उंबरगाव, विभूतवाडी, विठ्ठलापूर, वाक्षेवाडी, वलवण, यमाजी पाटलाचीवाडी आणि झरे या गावांतील ३८५९ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या गावातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ३ कोटी ४ लाख ५८ हजार ६२० रुपये निधीची गरज आहे.
अतिवृष्टीने ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकांसाठी दहा हजार आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार हेक्टर या दराने दोन हेक्टर मर्यादेपर्यंतच मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला; परंतु या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
कोट
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना टप्प्या-टप्प्याने मदत दिली जात आहे. पहिल्या टप्प्यात २७, तर दुसऱ्या टप्प्यात २४ गावांतील शेतकऱ्यांना मदत दिली आहे. उर्वरित दहा गावांतील शेतकऱ्यांसाठी निधीची मागणी केली आहे. निधी उपलब्ध होताच शेतकऱ्यांना देण्यात येईल.
- सचिन मुळीक,
तहसीलदार, आटपाडी