जत : जत ते सांगलीदरम्यान असणारा जत ते डफळापूर रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे येथील लहान-मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी जत तालुका मनसेतर्फे प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जत ते डफळापूर अंतर सुमारे सतरा किलोमीटर इतके आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे आहे, ते अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळत आहेत.
जत ते डफळापूर अंतर जाण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात; पण रस्ता खराब झाल्यामुळे पंचेचाळीस मिनिटे ते एक तास लागत आहे. रस्ता डांबरीकरण करून प्रवासी नागरिकांची होणारी गैरसोय कमी करावी, अन्यथा जत तालुका मनसेतर्फे २२ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी दिला आहे.
यावेळी शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण, तालुका उपाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष सुरेश बिळूर, तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.