तासगाव : तासगाव तालुक्यातील ग्रामीण भागात चिकुनगुन्या रोगाने थैमान घातले असून, अनेक नागरिक या आजाराने त्रस्त आहेत ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत भर पडत असून, आरोग्य विभागाकडून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
तासगाव तालुक्यात कोरोनोचे संकट कमी झाले आहे. या संकटातून बाहेर पडत असतानाच, तालुक्यातील अनेक गावांत चिकुनगुन्याने थैमान घातले आहे. तालुक्यातील आरवडे, विसापूर, कवठेएकंदसह अनेक गावांतून चिकुनगुन्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. खासगी रुग्णालयांत चिकुनगुन्यावर उपचार घेणार्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असताना, पंचायत समितीकडील आरेाग्य यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य प्रशासनाकडून या आजाराकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. लोकांपर्यंत पोहोचण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आरोग्य विभागाकडून तात्काळ उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी माणगी होत असताना अद्याप कोणतीही उपाययोजना राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोग्य विभागाकडील उदासीन कारभारामुळे लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
चाैकट
आरोग्य विभागाचा निरंकुष कारभार
तासगाव तालुक्यात आरोग्य विभागाचा निरंकुष कारभार सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावांत चिकुनगुन्या रोगाचा सामना करावा लागत आहे. याबाबत तक्रार करूनही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. आरोग्य यंत्रणेवर अंकुष ठेवून प्रभावी काम करण्यात प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. खासगी रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. तक्रार करूनही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून कोणत्याही उपाययोजना राबवल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांची बदली करून सक्षम अधिकार्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. तात्काळ उपाययोजना न राबवल्यास आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांनी दिला आहे.