सांगली : माधवनगर येथील सागर ज्वेलर्समधून चोरट्यांनी १५ तोळ्याचे सोने आणि चांदीच्या दागिन्यांची बॅग लंपास केली. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी मंगळवारी आणखी पाचजणांची चौकशी केली आहे. तसेच तांत्रिक तपासाचाही आधार घेतला जात असून, मंगळवारी दिवसभर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी दत्ताजी साळुंखे यांचे माधवनगरमधील बुधवार पेठेत ज्वेलर्सचे दुकान आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास साळुंखे यांनी ज्वेलर्स दुकान उघडले. घरातून १५ तोळ्याच्या सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांची बॅग त्यांनी आपल्या दुकानांतील काऊंटरच्या आतील बाजूस ठेवली होती. त्यावेळी संशयित दोघे चोरटे दुकानात आले. तुमचे पैसे दुकानाबाहेर पडले आहेत, असे सांगितले. साळुंखे हे पैसे घेण्यासाठी दुकानाबाहेर गेले. तितक्यात एका युवकाने दुकानात काऊंटरवर ठेवलेली बॅग घेतली. त्यानंतर दोघेही पसार झाले. दरम्यान, सोमवारी संजयनगर पोलिसांनी दहाजणांची चौकशी केली होती. मंगळवारी आणखी पाचजणांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी दिवसभर करण्यात आली.