संख : दरीबडची (ता. जत) येथील तलाठी विलास भरमण्णा चव्हाण (वय ४८) यास इकराराची नोंद घेऊन इकरार देण्याकरिता ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई तलाठी कार्यलयात बुधवारी दुपारी एक वाजता करण्यात आली.
जत पूर्व भागातील दरीबडची व लमाणतांडा येथे विलास चव्हाण तीन वर्षांपासून कार्यरत आहे. दरीबडची येथील एका शेतकऱ्याने सातबारा इकरार बोजा नोंदणीसाठी अर्ज केला होता. यासाठी तलाठी चव्हाण याने त्याच्याकडे ५०० रुपयांची लाच मागितली होती. यानंतर संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी दरीबडची ग्रामपंचायत येथे सापळा लावला होता. संबंधित शेतकरी हा दुपारी एकच्या सुमारास कार्यालयात आला. यावेळी त्याने तलाठी विलास चव्हाण याला ५०० रुपयांची लाच दिली. चव्हाण याने ही लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहात पकडले. विलास चव्हाण यांच्या विरुद्ध जत पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस अंमलदार फौजदार रवींद्र धुमाळ, सालीम मकानदार, संजय संकपाळ, संजय कलकुटगी, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, सुहेल मुल्ला यांनी केली.