लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील नागरिकांनी न्यायालयीन सेवांचा लाभ घ्यावा व पैसा व वेळेची बचत करावी. जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत आयोजित फिरते विधिसेवा केंद्र व लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी बुधवारी केले.
जिल्हा न्यायालयाच्या आवारात फिरत्या विधिसेवा केंद्र व लोकअदालतीच्या प्रारंभ करताना ते बोलत होते.
या उपक्रमानुसार जिल्ह्यातील विविध गावांत जाऊन कायदेविषयक जनजागृती व लोकअदालतीचे काम करण्यात येणार आहे.
यात दि.२ विजयनगर (ता. मिरज), ३ रोजी कुमठे, ४ बोरगाव (ता. तासगाव), ७ कोंगनोळी (ता. कवठेमंहाकाळ), ८ मुचंडी, ९ बनाळी (ता. जत), १४ रोजी दिघंची, १५ आटपाडी, १६ चिंचणी मगरूळ, १७ भाळवणी (ता. खानापूर), १८ घोगाव, २० भिलवडी (ता. पलूस), २१ तडसर, २२ वांगी (ता. कडेगाव), २३ मांगले, २४ कोकरूड (ता. शिराळा), २७ वाटेगाव, २८ कासेगाव (ता. वाळवा), २९ तुंग, आणि ३० रोजी कवलापूर (ता. मिरज) येथे कायदेविषयक शिबिरे व लोकअदालत होणार आहेत.
या लोकअदालतींमध्ये प्रलंबित असलेले दावे व किरकोळ खटले तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत.
यावेळी न्यायाधीश आर.के. मलाबादे, डी.पी. सातवळेकर, आर.एन. माजगावकर, आर.व्ही. जगताप, एस.पी. पोळ, एल.डी. हुली, पी.ए. साने, पी.पी. केस्तीकर, जिल्हा सरकारी वकील ॲड. अरविंद देशमुख, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश विश्वास माने आदी उपस्थित होते.