सांगली : जत तालुक्यातील संख येथील सी. जी. बालगाव व करजगी येथील अशोक जेऊर हे स्वस्त धान्य दुकानदार बेकायदेशीरपणे दुकान चालवत आहेत. कार्डधारकांना धान्य कमी देणे, जादा दराची आकारणी करणे यासह इतर तक्रारी असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांचे परवाने निलंबित करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संख येथील बालगाव हे दुकानदार व करजगी येथील अशोक जेऊर यांच्याविरोधात कार्डधारकांनी जबाब दिला असतानाही कारवाई होत नाही. संखच्या अप्पर तहसीलदारांनी याबाबत पंचनामा करून अहवाल सादर करूनही कारवाई हाेत नाही. जिल्हा पुरवठा अधिकारीही या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
संघटनेचे भीमाशंकर बिरादार, सिध्दगोंडा बिरादार, नागनाथ शिलीन, राजकुमार बिरादार, विठ्ठल कुंभार, परशुराम सबई यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.