ओळी : शिराळा तहसील कार्यालयात आयाेजित पाणीटंचाई आढावा बैठकीत आमदार मानसिंगराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, युवानेते विराज नाईक व गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याविना कोणत्याही गावचे अथवा वाडी, वस्तीचे हाल होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, आशा सूचना आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिल्या.
शिराळा तहसील कार्यालयात झालेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे व युवानेते विराज नाईक उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, शिराळा तालुका डोंगराळ व दुर्गम असल्याने उन्हाळ्यात येथील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा बसतात. ही गावे विशेषतः डोंगरमाथ्यावरील आहेत. त्यामध्ये सोनवडेपैकी काळोखेवाडी व जळकेवाडी, रांजणवाडी, बेंगडेवाडी, शिंदेवाडी, चिंचेवाडी, खराळे, वाकाईवाडी, आरळापैकी बेरडेवाडी व येसलेवाडी, खेड, बेलदारवाडी, गुंडगेवाडी-करुंगली या गावांचा सामावेश आहे. प्रशासनाने पाणीटंचाईचे नियोजन करताना, येथे पाण्याचा स्रोत उपलबद्ध आहे, तेथे कूपनलिका घ्याव्यात. ज्या ठिकाणी विहिरींना पाणी उपलब्ध आहे, त्या अधिग्रहण कराव्यात. जेथे कोणताच स्रोत उपलब्ध नाही, तेथे टँकरने पाणीपुरवठा करावा, जेणेकरून नागरिकांचे पाण्याविना हाल होणार नाहीत, याची संपूर्णपणे खबरदारी घ्यावी.
तहसीलदार गणेश शिंदे यांनी स्वागत करून टंचाई जाणवणाऱ्या गावांचा आढावा घेतला. येथे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यावर सविस्तरपणे चर्चा केली. आमदार नाईक यांनी प्रत्येक गावाची ग्रामसेवकाकडून सद्यस्थितीची माहिती घेतली. त्यावरून काही मार्गदर्शक सूचना दिल्या. या बैठकीला गट विकास अधिकारी डॉ.अनिल बागल, पंचायत समितीचे उपअभियंता बाहुबली हुकिरे, सर्व गावचे ग्रामसेवक उपस्थित होते.