मंगळवारी विटा ते मायणी रोडवर सुहास बाबर यांनी नगरपालिकेच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर माजी नगराध्यक्ष पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या आंदोलनाचा समाचार घेतला.
वैभव पाटील म्हणाले, मायणी रोडवरच्या पुलाचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे विकास काम हे विटा नगरपरिषदेतर्फे रितसर सुरू आहे. रुंदीकरणानंतर रस्ता करण्यापूर्वी रस्त्याची लेवल एकसारखी करण्याकामी मुरूम भरावा करून डांबरीकरण केले आहे. या परिसरातील चव्हाण परिवाराच्या इमारतीमधील बेसमेंटला जमा होणारे पावसाचे पाणी बाहेर काढून याच ओढापात्रात सोडण्यासाठी त्यांनी रितसर अर्ज देऊन त्यांच्या इमारतीपासून ओढ्यापर्यंत जेसीबीने खुदाई करून चर काढली आणि पाईपलाईन केली. यामध्ये तयार झालेल्या खड्ड्यात एक ट्रक अडकण्याची दुर्दैवी घटना घडली. हा ट्रक काढून रस्त्याचे व पुलाचे डांबरीकरण काम प्रगतीपथावर येणारच होते.
सुहास बाबर यांना रस्त्याचा व विट्याचा एवढा पुळका असेल, तर प्रथम सांगली रोडवरच्या तीन ओढ्यांवरच्या पुलाची देखभाल-दुरुस्ती करावी. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी स्वमालकीची जागा विनामोबदला शासनास देऊन तालुका क्रीडा संकुल बांधले. त्याच्या दुरवस्थेबद्दल बोलावे व मग विटा नगरपरिषदेच्या कारभारावर बोलावे. सवंग प्रसिद्धीसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घ्यायची आम्हास व विटेकरांनाही गरज नाही. विटेकर सूज्ञ आहेत. तरीही गैरसमज पसरू नयेत, म्हणून हा खुलासा केला असल्याचे वैभव पाटील म्हणाले.
चौकट
ज्यांनी भ्रष्ट कारभाराने साखर कारखाना, सूतगिरणी, पतसंस्था, बँका संपविल्या, ज्यांना गेल्या ४० वर्षांच्या राजकारणात एकही नवी संस्था सुरू केली नाही. स्वतःच्या गार्डी गावाचा पाणी, रस्त्याचा प्रश्न सोडविता आला नाही, ज्यांच्या गावाची स्मशानभूमी मोडकळीस आली आहे, त्यांनी विकासकामे व भ्रष्टाचारावर बोलणे हा जगातील सर्वात मोठा विनोद असल्याची टीका वैभव पाटील यांनी केली.