सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ ताण वाढविणारी असली, तरी प्रशासनाने सर्व नियोजन केले आहे. संसर्ग वाढू नये यासाठीच कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्य शासनाच्यावतीने दिलेल्या सूचनांचे पालन करताना त्यामुळे काही घटकांना त्रास होत असला, तरी जनतेच्या सुरक्षेसाठीच कडक निर्बंधाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे त्यास विरोध करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार बैठकीत केले.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियाेजनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. चौधरी म्हणाले, कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे रुग्णसंख्या कमी होण्याबरोबरच कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे. मात्र, व्यापाऱ्यांसह इतर घटकांना त्याची झळ बसत आहे. व्यवसाय सुरू करण्याबाबतच्या मागण्यांबाबत शासनाला कळविण्यात येईल; पण तोवर व्यापाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करू नये. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नाला समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य द्यावे. लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचे अथवा रद्द करण्याचे कोणतेही अधिकार प्रशासनाकडे नाहीत. शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून न घेता प्रशासनास सहकार्य करावे.
जिल्ह्यात कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरसह इतर औषधांचा मुबलक साठा असून, आता तालुका पातळीवरही ऑक्सिजनची सुविधा असलेले कोविड सेंटर्स उपचारासाठी सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार होणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
होम आयसोलेशनचे उल्लंघन नको
होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणारा रुग्ण बाहेर फिरला, तर त्याच्यापासून संसर्गाची शक्यता वाढते. त्यामुळे होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रूग्णांनी नियमांचे पालन करावे. पोलिसांकडूनही रुग्णाच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांनी क्वारंटाईन कालावधीत प्रशासनास सहकार्य न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
चौकट
शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू, संचारबंदी कडक
शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. यामध्ये औषधे, किराणा दुकान, बेकरीसह अत्यावश्यक सेवा नागरिकांना मिळणार आहेत. मात्र संचारबंदी कडक असेल. बाहेर पडण्यासाठी महत्त्वाचे कारण असेल तरच घराबाहेर पडावे. या कालावधीत सर्व बंद असले, तरी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना चालू राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.