लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी आष्टा शहरात ३ दिवस बुथनुसार बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. जागेवरच या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. या बैठकांमुळे शहरातील मंत्री जयंत पाटील गटाला बळ मिळाले आहे.
आष्टा पालिकेत माजी आमदार विलासराव शिंदे व मंत्री जयंत पाटील गटाची निर्विवाद सत्ता आहे. नव्वदच्या दशकानंतर दोन्ही नेते एकत्र आल्यानंतर आष्टा पालिकेचा कारभार माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीच सुरू होता. विलासराव शिंदे असताना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पालिकेत लक्ष दिले नव्हते. विलासराव शिंदे शहरातील सर्व समस्यांबाबत बैठका घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे मंत्री जयंत पाटील फक्त लोकसभा व विधानसभेच्या सुरुवात व शेवटच्या बैठकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असत.
मात्र विलासराव शिंदे यांच्या पश्चात मंत्री जयंत पाटील यांनी आष्टा पालिकेच्या विविध विकास कामांना कोट्यवधीचा निधी दिला आहे. लोकांच्या समस्या जागेवरच सोडवता याव्यात. या दृष्टिकोनातून मंत्री पाटील यांनी शहरातील सर्व प्रभागात असलेल्या बुथ कमिटीच्या बैठका घेतल्या. सायंकाळी ६ पासून रात्री १२ ते १ वाजेपर्यंत मंत्री पाटील यांनी वेळ देऊन समस्या सोडवल्या.
या बैठकांत माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांनी शहरातील समस्या व यासाठी पालिकेने राबवलेल्या योजनांबाबत पाटील यांना माहिती दिली. नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्यासह राजारामबापू कारखाना संचालक विराज शिंदे, माणिक शेळके, दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे, उज्ज्वला पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, रघुनाथ जाधव, बबन थोटे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.