सांगली : विधानसभा निवडणुका जवळ आल्या की राजकीय स्टंटबाजीला सुरुवात होते. अशाप्रकारची स्टंटबाजी थांबवावी. पलूसच्या घटनेबाबत पोलीस योग्य तपास करतील, मात्र दगडफेकीसारख्या घटनेतून होणारी गुंडगिरी अयोग्य आहे, असे मत पालकमंत्री पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.पलूस येथील आमसभेतील मारामारी व सांगलीतील कदम यांच्या बंगल्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पतंगरावांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमसभेमध्ये लोकांचे प्रशासकीय सेवेशी निगडीत प्रश्न मांडले जात होते. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्याने ऊसदराचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचा आणि आमसभेचा काहीही संबंध नव्हता. निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी ऊसदर दिला, तर कारखान्यांवर फौजदारी गुन्ह्याची तरतूद आहे. त्यामुळे हा प्रश्न याठिकाणी मांडू नये, असे आम्ही सांगितले. त्यानंतर गोंधळ झाला. राजोबा यांना मारहाण झाली किंवा नाही? झाली असेल तर कोणी केली, या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने पोलीस तपास करतील. राजोबा यांना यापूर्वीच मारहाण करायला हवी होती, अशा आशयाचे वाक्य माझ्या तोंडी टाकून त्याचा प्रसार केला जात आहे. यात कोणतेही तथ्य नाही. गोंधळ सुरू असताना मीच तो थांबविण्याची विनंती केली. राजोबा यांच्या प्रश्नांना मी उत्तर देणारच होतो. तरीही गोेंधळ झालाच. त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवू नये, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
राजकीय स्टंटबाजी थांबवा
By admin | Updated: June 22, 2014 00:28 IST