कुपवाड : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात महाविकास आघाडी व शहर परिसरातील शेतकरी यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात कुपवाड शहरासह विस्तारित परिसर व ग्रामीण भागातील शेतकरी सहभागी झाले.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कुपवाड शहरातील व ग्रामीण भागातील शेतकरी, महाविकास आघाडी यांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आले. भारतीय संविधानाचे वाचन करून आंदोलनास सुरुवात झाली. दिल्लीतील आंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रवीण कोकरे यांनी प्रास्ताविक केले. सदाशिव मगदूम यांनी गीत सादर केले. शिवसेनेचे बजरंग पाटील, नगरसेवक विष्णू माने, अमित शिंदे, सागर ऊर्फ महावीर खोत, जयश्री शेट्टी, कुलभूषण कर्नाळे, आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या बाबतीत अन्यायकारक असल्याचे सांगत केंद्र सरकारचा निषेध केला.
यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या उपस्थितीत बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सनी धोतरे, अमर दिडवळ, बिरू आस्की, प्रकाश घुटुकडे, रूपेश मोकाशी, सचिन जमदाडे, प्रकाश व्हनकडे, नितीन लोकापुरे, अमोल कदम, जिनगोंडा पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो : ०६ कुपवाड १
ओळ : कुपवाडमध्ये दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.