गोटखिंडी : वाळवे तालुक्यातील गोटखिंडी-भडकंबे या रस्त्यावरून मोठ्या अवजड वाहनांमुळे खड्डे पडलेले आहेत. गोटखिंडी येथील एक किलोमीटर रस्त्याची दैना झाल्याने नागरिकांना पायी चालत जाणेही मुश्कील बनले आहे.
गोटखिंडी व परिसरातील नागरिकांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी हा रस्ता जवळचा आहे. संतोषगिरी डोंगर परिसरातील भडकंबे, पोखर्णी बाजूस खडीचे प्लांट व मुरूम उत्खनन सुरू आहे. या ठिकाणचे ३० ते ४० टनाच्या डंपरची या रस्त्यावरून वाहूक होत असते. या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत. काही जण जखमी झाले आहेत.
तसेच या अवजड वाहतुकीमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनलाही गळती लागली आहे. अमृतधारा दूध डेअरीसमोरील मुख्य रस्त्यावरील नाल्याला भगदाड पडले आहे. त्या ठिकाणी दगड ठेवून खड्ड्यात लाकडी दांडके उभे करून येथे खड्डे पडल्याचे निशाण युवकांनी उभे केले आहे. संबंधित विभागाने तत्काळ खड्डे बुजवून घेऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.