सांगली : महापालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत बहुमताची जुळवाजुळव करणाऱ्या पक्षाचा उमेदवारी निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संख्याबळ दाखवा आणि महापौरपदाची उमेदवारी घ्या, अशी भूमिका आघाडीची दिसून येत आहे. मंगळवारी काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीतही हाच सूर होता, तर काही नगरसेवकांनी मात्र महापौरपदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा आग्रहही धरला. आता बुधवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत असून, त्यात महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारीचा तिढा सुटेल, अशी चिन्हे आहेत.
महापौर, उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक झाली. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, माजी महापौर किशोर जामदार यांनी बंद खोलीत नगरसेवकांची मते जाणून घेतली. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांना विकासकामांत डावलले जात आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. राज्यातील सत्तेच्या माध्यमातून शहरात विकासासाठी जास्तीत-जास्त निधी आणता येईल. यासाठी महापालिकेत सत्ता परिवर्तन महत्त्वाचे असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
महापौरपदासाठी ३९ नगरसेवकांची आवश्यकता आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे ३४ नगरसेवक आहेत. आणखी ५ नगरसेवक कमी पडतात. त्यामुळे जो इच्छुक संख्याबळाचे गणित जमवून आणले, त्या पक्षाला उमेदवारी द्यावी, अशी भूमिका काही नगरसेवकांनी घेतली; तर काही मात्र त्याला विरोध करीत महापालिकेत काँग्रेसचे संख्याबळ राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे काँग्रेसलाच महापौर पदाची संधी मिळाली पाहिजे, असा आग्रह विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांच्यासह काही नगरसेवकांनी धरला. आता राष्ट्रवादीसोबत बुधवारी बैठक होणार आहे. त्यानंतर बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल. यावेळी नगरसेवक अभिजित भोसले, प्रकाश मुळके, मनोज सरगर, वर्षा निंबाळकर, करण जमादार, अमर निंबाळकर, वहिदा नायकवडी, शुभांगी साळुंखे, मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, संतोष पाटील उपस्थित होते.
चौकट
राष्ट्रवादीशी चर्चेनंतर निर्णय - पृथ्वीराज पाटील
महापालिकेत भाजपच्या सत्तेमुळे शहराचा विकास रखडला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची विकास कामे होत नाहीत, त्यामुळे महपालिकेत सत्ता परिवर्तन महत्त्वाचे आहे. काँग्रेस नगरसवेकांची मते मंत्री विश्वजित कदम यांना कळवण्यात आली आहेत. बुधवारी राष्ट्रवादीशी चर्चा करून १८ रोजी आघाडीचे महापौर, उपमहापौर पदाचे उमेदवार जाहीर केले जातील, असे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले.
चौकट
दोन्ही पक्ष अर्ज भरणार - विशाल पाटील
विशाल पाटील म्हणाले, महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक राष्ट्रवादीशी आघाडी करून लढविण्यात येणार आहे. दोन्ही पक्षात एकमत होऊन उमेदवार ठरवण्यास विलंब होत आहे. त्यामुळे इच्छुकांनी दोन्ही पदांसाठी अर्ज भरावेत व अर्ज माघारीपूर्वी अंतिम उमेदवार निवडावेत, असे बैठकीत ठरले आहे. याबाबत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीला निरोप देतील, असे सांगितले.