विटा : खानापूर तालुक्यात होणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र आता तासगाव किंवा सांगली येथे नेण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. हा प्रकार त्वरित थांबवावा, अन्यथा हे उपकेंद्र खानापूर येथेच होण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभा करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिला.
ते म्हणाले, २०१८ मध्ये विजापूर ते गुहागर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ई मंजूर झाला. मंजूर निविदेप्रमाणे हा महामार्ग चारपदरी होता. मात्र, प्रत्यक्षात तो दोनपदरीच झाला व उर्वरित दोनपदरी दुसरीकडे वळविण्यात आला. या महामार्गाप्रमाणेच २०१७-१८ ला सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर झाले होते. त्यावेळी जागेची पाहणीसुध्दा झाली आहे. मात्र, हे विद्यापीठ दुसरीकडे पळवून नेण्याचा घाट काही मंडळींनी घातला आहे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे.
त्यामुळे काहीही झाले, तरी हा प्रकार खानापूर तालुक्यातील नागरिक खपवून घेणार नाहीत. हे उपकेंद्र खानापूर येथेच होण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल, परंतु, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच झाले पाहिजे. यासाठी दि. २४ जानेवारीपासून अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने खानापूर तालुक्यात ठिकठिकाणी बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गोपीनाथ सूर्यवंशी यांनी केले.