कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढविणार असून, सर्वच म्हणजे ८१ जागांवर ताकदीचे उमेदवार देऊन एकहाती सत्ता घेत पक्षाचा पहिला महापौर करणार, असा विश्वासही संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. संधिसाधू भाजपने विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करीत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा घणाघाती हल्ला यावेळी त्यांनी चढविला. तत्पूर्वी, शासकीय विश्रामगृह येथे संपर्कप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार गटबाजी संपवून आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे मैत्रीदिनी मनोमिलन घडवून आणण्यात आले. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दुधवडकर यांनी पवार-क्षीरसागर यांच्यातील गटबाजी संपल्याचे सांगितले. पवार व क्षीरसागर यांनी आपापसांत कोणतेच मतभेद नव्हते, असे सांगून महापालिका निवडणुकीत भगवा फडकवून शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करू, असे सांगितले.दुधवडकर म्हणाले, महापालिका निवडणूक नजीक येऊन ठेपली आहे. कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, येथे पक्षाचे सहा आमदार निवडून आले आहेत. अनेक दिवसांपासून पक्षातील अंतर्गत वादाची चर्चा होत आहे; परंतु शिवसेनेमध्ये कोणताही टोकाचा वाद नाही. घरातील भांडणे घरातच मिटतात; त्यामुळे शिवसेना संपवू पाहणारे स्वत:च संपतील. स्थानीय लोकाधिकार समितीसह अन्य कंपन्यांद्वारे सर्व्हे करून निवडून येण्याचा निकष पाहून उमेदवारी दिली जाईल. सक्षम शिवसैनिकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. शिवसेना सद्य:स्थितीला ८१ जागा स्वबळावर लढेल. या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पक्ष सर्व जागा स्वबळावरच लढणार असून, आरपीआय व स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत आल्यास त्यांचा विचार करू. उमेदवारांची यादी ही ‘मातोश्री’वरूनच जाहीर होणार आहे. भाजप हा संधिसाधू पक्ष असून, विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे त्यांनी आताही पाठीत खंजीर खुपसला आहे; परंतु शिवसेना सतर्क असल्याने व भाजपची कोल्हापुरातील ताकद नगण्य असल्याने पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. भाजपने ‘ताराराणी’शी केलेल्या आघाडीचा काडीमात्र परिणाम होणार नाही. भाजपची आघाडी ही कॉँग्रेसमधीलच एका गटाशी केलेली आघाडी आहे. एकटे लढून सत्तेवर येऊन दाखवू आणि पहिला महापौर शिवसेनेचाच करू. पक्षाचा प्रमुख विरोधक कॉँग्रेस व राष्ट्रवादीच आहे. त्याचबरोबर कॉँग्रेस, राष्ट्रवादी, ताराराणी आघाडी-भाजप यांच्या मतविभाजनाचा शिवसेनेलाच फायदा होणार आहे.गेल्या ३० वर्षांतील ताराराणी आघाडी, तसेच कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसचा काळा, भ्रष्टाचारी, लाचखोरी कारभार, पदाच्या खांडोळ्या व विकासशून्य शहर हे सर्व मतदारांना दाखवून जागृती करू. विकास, भ्रष्टाचारमुक्त कारभार, चांगल्या सुविधा, हद्दवाढ, टोल असे मुद्दे प्रचारात आहेत. गतनिवडणुकीत शिवसेनेचे पाच उमेदवार विजयी झाले, तर २२ उमेदवार क्रमांक दोनवर राहीले. येथे बळ देऊन हे उमेदवार निवडून आणू. या निवडणुकीत मुंबईहून स्थानिक लोकाधिकार समितीची पथके प्रत्येक प्रभागात कार्यरत राहतील. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून उमेदवारांना आर्थिक ताकदीसह सर्वच प्रकारची यंत्रणा पुरविली जाणार आहे. (प्रतिनिधी)वशिलेबाजी असती तर आम्ही आमदार नसतो शिवसेनेत वशिलेबाजीशिवाय मंत्रिपदे मिळत नाहीत, या पालकमंत्री पाटील यांच्या वक्तव्यावर क्षीरसागर म्हणाले, राज्यस्तरावर शिवसेना-भाजप युतीची बोलणी करण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी आपल्याकडे उद्धव ठाकरे यांचा व्यक्तिगत दूरध्वनी क्रमांक मागितला होता, हे त्यांनी कबूल करावे. यावरूनच शिवसेनेत शिवसैनिकांना किती स्थान आहे, हे दिसून येते. तसेच वशिलेबाजी असती तर आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आमदारच झाले नसते.उपस्थितांची नावेबैठकीस आमदार उल्हास पाटील, आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, महिला जिल्हा संघटक शुभांगी साळोखे, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे, आदी उपस्थित होते.पालकमंत्री पदाचा काही फरक पडणार नाहीभाजपकडे पालकमंत्रिपद आहे. त्या पदाचा महापालिका निवडणुकीवर प्रभाव राहणार काय? या प्रश्नावर दुधवडकर यांनी, या मंत्रिपदाचा कोणताही फरक या निवडणुकीवर पडणार नसून, शिवसेनेचे आमदारच त्यासाठी समर्थ असल्याचे स्पष्ट केले.‘ताराराणी’शी भाजपची युती दुर्दैवीज्या कॉँग्रेसवर टीका करून भाजपने केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळविली, त्याच पक्षाच्या ताराराणी आघाडीसोबत युती दुर्दैवी असल्याची टीका दुधवडकर यांनी केली. ‘ताराराणी’शी फारकत घेतल्यास युतीचा विचारताराराणी आघाडीशी युती करताना भाजपने शिवसेनेबरोबर युती करणार नसल्याचे थेट वक्तव्य केलेले नाही. या पार्श्वभूमीवर भाजपकडून युतीचा प्रस्ताव आल्यावर तुमची भूमिका काय राहील? अशी विचारणा केल्यावर दुधवडकर यांनी, त्यांनी प्रथम ताराराणी आघाडीशी फारकत घ्यावी; मगच युतीचा विचार करू, असे स्पष्ट केले.पालकमंत्री कोणाच्या डोक्याने चालतात?आमदार महादेवराव महाडिक यांनी विधान परिषद निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपशी जवळीक केली आहे. जसा एखाद्याचा जीव पोपटात असतो, तसा त्यांचा जीव विधान परिषदेच्या आमदारकीत असल्याचा टोला हाणत दुधवडकर यांनी पालकमंत्री कोणाच्या डोक्याने चालतात, हे जनतेला माहीत आहे, असा चिमटाही काढला.कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी शिवसेना संपर्कप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शेजारी आमदार उल्हास पाटील, संजय पवार, आमदार राजेश क्षीरसागर, विजय देवणे, शिवाजीराव जाधव उपस्थित होते.
शिवसेना निवडणूक स्वबळावर लढणार
By admin | Updated: August 3, 2015 00:45 IST