बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील शिराळा ते कोकरूड रस्त्याचे काम काही ठिकाणी रखडले आहे. बिळाशी बस स्टॅन्डपासून आंबेडकरनगरपर्यंत चढ कमी करून रस्ता करणेबाबत नागरिक आक्रमक झाल्याने रस्त्याचे काम बंद पाडले आहे.
याबाबतची माहिती अशी की, सोलापूर ते रत्नागिरी महामार्गाचे काम सध्या जलदगतीने सुरू आहे. शिराळा ते कोकरूड या रस्त्याचेही काम जलदगतीने सुरू आहे. परंतु काही ठिकाणचे काम अपूर्ण ठेवल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. बिळाशी हुतात्मा स्मारक ते खुंदलापूर यादरम्यानचा चढ तसाच राखल्यामुळे येथे अपघातग्रस्त क्षेत्र बनले आहे. यापूर्वी अनेकदा वारणा प्रसाद विद्यालयासमोर अपघात झालेले असतानाही, सदरचा चढ कमी केला गेला नाही. सध्या बिळाशी मुक्ताबाई रोडपासून बस स्टॅन्ड व आंबेडकरनगरपर्यंतचा भाग चढाचा आहे. तो चढ कमी करून रस्ता करण्याची मागणी नागरिकांची आहे. याबाबत ग्रामपंचायतीनेही सार्वजनिक बांधकाम व संबंधित ठेकेदाराला निवेदन दिले आहे. सध्या आहे त्या स्थितीतच खडीकरण करून डांबरीकरण करण्याचा ठेकेदाराचा डाव येथील नागरिकांनी हाणून पाडला व काम बंद पाडले.
दरम्यान, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व बिळाशी ग्रामस्थ यांच्या चर्चेतून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रचिती दूध संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस यांनी पुढाकार घेतला आहे.