इस्लामपूर : काँग्रेसची संस्कृती जनतेच्या हिताची आहे. कार्यकर्त्यांनी कोणाच्याही जागा हडप केलेल्या नाहीत, कोणालाही लुबाडलेले नाही, असा टोला नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांना मारताना जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यशापयशाची चिंता न करता ताकदीने लढावे, असे आवाहन गुरुवारी केले.येथे शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. अध्यक्षस्थानावरून मोहनराव कदम बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष सदाशिवराव पाटील, सरचिटणीस सौ. मालन मोहिते, ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते, पक्ष प्रभारी प्रकाशराव सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.कदम म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांची पाटी कोरी आहे. त्यांनी कोणाला त्रास दिलेला नाही. त्यामुळे मतदार निश्चितपणे पाठिंबा देतील. शहराचे, जनतेचे प्रश्न ताकदीने मांडा, जनतेसोबत राहा. त्यातून यश मिळेल. नगरपालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे.सदाशिवराव पाटील म्हणाले की, इस्लामपूर शहर सधन परिसर असल्यामुळे प्रत्येकजण नेता होण्याच्या मानसिकतेत आहे. निवडणूक लढविण्याच्या पध्दती वेगळ्या असतात. विरोधकांमधील फूट सत्ताधाऱ्यांसाठी शक्तिस्थळ ठरते. त्यामुळे एकसंध राहा. पक्ष आणि उमेदवार अशा दोन्ही पातळीवर मतदार विचार करतो. त्यामुळे निवडणुकीला सक्षमपणे सामोरे जायला हवे.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील कार्यकर्ते सहकार्य करतील. काँग्रेसच्या वरिष्ठांनी उमेदवारांना बळ द्यावे. सत्ताधाऱ्यांनी सामान्यांवर आरक्षणे टाकून त्यांना दहशतीखाली ठेवले आहे. राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे.पक्ष प्रभारी प्रकाशराव सातपुते म्हणाले की, पक्षाची संघटना भक्कम करुन निवडणुकीला सामोरे जाऊ. जिल्ह्यातील सर्व नेते येऊन उमेदवारांना बळ देतील. कार्यकर्त्यांनी एकसंधपणे कामाला लागावे.शहराध्यक्ष अॅड. आर. आर. पाटील यांनी स्वागत, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविक, धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस सतीश पाटील, अजित ढोले, विजय पवार, दादासाहेब पाटील, अमित पाटील, विशाल शिंदे, राजेंद्र वलांडकर, संजय शिंदे, दिलीप जाधव, प्रमोद शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)सदाभाऊंच्या कानपिचक्यानगरपालिकेतील सत्ताकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. केवळ १८५ कार्यकर्ते उपस्थित असल्याचे सांगत, बरे वाटले, असेही ते म्हणाले. येथील राष्ट्रवादीची भक्कम व्यवस्था माहीत असल्याने, सत्ता मिळवू, या भ्रमात राहू नका, असाही सल्ला त्यांनी दिला. जे सत्य आहे ते स्वीकारा, सत्याला सामोरे जा. हत्तीबरोबर दांडू खेळायचा आहे, रक्तबंबाळ झाला तरी निवडणूक लढवायची आहे, हे लक्षात घ्या. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. पण वस्तुस्थिती माहीत असली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी खडे बोल सुनावले.
इस्लामपुरात सत्ताधाऱ्यांनी जागा हडपल्या
By admin | Updated: September 9, 2016 01:13 IST