जत : आधीच दुष्काळी तालुका, त्यात कोरोना महामारीमुळे शाळा बंद. ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्ट फोन नाही. यासाठी शालेय विद्यार्थी आता घरातील आई-वडिलांच्या मदतीसाठी कामाला जात असल्याचे चित्र जत तालुक्यात दिसत आहे. यामुळे जत तालुक्यात बालमजुरीचे प्रमाण वाढले आहे.
शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केल्याने महामारीपासून तालुक्यासह परिसरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. पण महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ही सुट्टी तब्बल दोन वर्षावर गेली. सतत शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद झाले व पालकांच्या हाताला काम नसल्याने शालेय विद्यार्थी आता मजुरीकडे वळले आहेत.
जत तालुक्यात जवळ-जवळ ३५० च्यावर प्राथमिक शाळा आहेत. तर ५ किलोमीटर अंतराने माध्यमिक शाळा उपलब्ध झाल्या आहेत. या शाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करीत असतात. परंतु, गतवर्षीपासून काही दिवसांचा अपवाद वगळता शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर आज शिक्षणापासून दूर जाण्याची वेळ आली आहे. एक वर्षापासून शाळेचे कुलूप उघडले नाही. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडिलांना कामात मदत करण्यासाठी कामावर जावे लागत आहे. बाल मजुरांची संख्या वाढली आहे.
शिक्षण घेण्याच्या वयात काम करावे लागत असल्याने या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यासह परिसरातील अनेक शाळेतून शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबातील आहेत. ज्याचे पालक ऊसतोडणी मजूर, विटकामगार, कामगार, शेतगडी, हमाल तर काही मजूर वर्ग असल्याने यांची बालके आपल्या मुलाला शिक्षण द्यावे, या उद्देशाने शाळेमध्ये प्रवेश करीत असतात. परंतु कोरोनामुळे गतवर्षीपासून शाळा बंद असल्याने सर्व विद्यार्थी घरीच आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी आई- वडिलांच्या कामात मदत करीत असल्याचे दिसून येत आहे. तर काही विद्यार्थी खेळाकडे वळले असल्याचे दिसून येत आहे. तर ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते विद्यार्थी इंटरनेट खेळाकडे वळली आहेत.